मैत्रीकडे बघतांना…
रक्ताच्या नात्यापेक्षाही मैत्रीचं नातं श्रेष्ठ असतं. विश्वाच्या बांधावरच हे नातं
टिकत असतं तर संशयाच्या खरकटया भांड्यात मैत्रीरूपी दुध नासतं. खरेपणाच्या
भाषेवर हे नातं जोम धरीत असतं. तर खोटेपणाच्या आडोशाला कुठं तरी नासत
असतं. मित्राच्या दुःखाला मित्रानेही सोसावं लागतं, तर एकमेकांच्या आनंदात दोघांनाही
हसावे लागते.
मैत्री हे असं नातं आहे जे सदोदित फुलत राहतं. श्रावण ऋतुप्रमाणे नेहमीच
बहरत राहतं. मैत्रीला कोणतीच जात नाही. धर्म नाही. वाचनं बंधन नाही. लिंगाच
बंधन नाही. मैत्री केवळ मुली-मुलीत, मुला मुलात किंवा मुला मुलीत मैत्री तसेच
कुणातही असू शकते आणि हे सर्वात महत्त्वाचं असून सुद्धा आज समाजापुढे एवढेच
चित्र आहे की मुला मुली मध्ये मैत्री असली तर ती मैत्री नसून लफडे असते. आज
बदलत्या परिस्थितीमुळे ‘लफडं’ असते. ‘लफडं’ हा शब्द समाजात जास्त रुढ
झालाय. म्हणून मुद्दामच तोही वापरला आपल्याला लवकर समजण्यासाठी. पण असं
का होतं? समाज हे मानायला का तयार नाही की दोन व्यक्ती मैत्रीच्या नात्यात
बांधल्या गेल्या तर ते प्रेमाहून अधिक जवळचं आणि निर्मळ नातं असू शकतं. फक्त
दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून चालत नाही ना? मैत्रीसारख्या पवित्र नात्याला हा
समाज आणि त्या मैत्रीकडे पाहणारे एवढया खालच्या दर्जाने पाहतात. त्यांना कधी
समजेल ही ज्या व्यक्तीने मैत्री मिळविली त्यांनी सर्व काही मिळविलं.
मित्र मैत्रिणींच्या सहवासाने जीवनातील अंगण फुलून येते. मैत्री विधात्याकडून
मनुष्य जीवनाला मिळालेली आंदण भेट आहे. मैत्री जी संकटकाळी स्नेहाची, प्रेमाची
जाळी विणते जी प्रेरणादायी आत्मविश्वास देते. प्रत्येकाच्या ठायी ठायी आनंद धन
बरसवते. मैत्री नेहमी सोबत करते. मोकळेपणाने मन मोकळे करते. मनातील भावना
मोकळया करते. हे मित्र मिळण्यास महाकठिण ! म्हणूनच म्हणतात ना.
“सोन्याचे हजार तुकडे केले तरी ते गुणधर्म सोडत नाही.
खरे मित्र विखुरले तरी नातं मात्र तुटत नाही.”
खऱ्या मैत्रीसाठी जात, धर्म, शिक्षण, मान, सन्मान, प्रतिष्ठा काहीही आड
येत नाही. म्हणूनच कृष्णा व सुदामा हे खरे मित्र होते. एक विश्वंभर तर दुसरा दिगंबर!
एक द्वारकेचा राजा तर दुसरा बामण बापुडवाला ! अर्थात एक महत्वाची गोष्ट लक्षात
ठेवायला हवी की ही मैत्री निरपेक्ष होती. सुदाम्याला देखील सुवर्णसदन नको होते.
खरी मैत्री निरपेक्षच असते. अपेक्षा करावी लागत नाही. मित्र लागत नाही. मित्र खरा
असेल तर तो मित्राची अडचण स्वत:च ओळखतो आणि त्यानुसार व आपल्या
विचारानुसार काम करतो.
मित्र लांबवर पसरलेल्या विस्तीर्ण अवकाशासारखा असतो. मैत्रीची नाती,
त्यांची परिभाषा करायला गेले तर शब्द खुंटतात. जीवाला जीव देणारी अनुभवून
पाहण्याचीच चीज आहे. पक्ष्याला जेवढे पंखाचे महत्त्व आहे. किंवा पंखाशिवाय पक्षीच
असू शकत नाही. मानवी जीवन हे मित्राशिवाय असू शकत नाही. खरे मित्र आणि
प्रशंसा ह्या दोन गोष्टी अगदी विरुद्ध आहेत. कारण मित्र आपली प्रशंसा कधीच करणार
नाही. आपण जर एखादे वाईट कृत्य केले तर तो नक्कीच आपल्यावर रागावेल.
आपल्या एखादया चांगल्या कृत्याबद्दल तो नक्कीच वाहवा करेल. हे ही सुर्यप्रकाशा
इतके सत्य आहे. मित्राच्या सोबत आपल्याला वाईट कृत्य करण्याची सुद्धा शरम
येते, असे ना.सी. फडकेंनी सुद्धा म्हटले आहे.
अरे, मैत्री तर द्रोपदी आणि कृष्णातही होती. ते देशातील एक स्त्री नि पुरुषच
होते ना ? मग त्यांच्या मैत्रीला त्या काळात कोणीच विरोध केला नाही. त्यांच्या
मैत्रीला कुणीच नाव ठेवले नाही अस कां? आताच का नावं ठेवली जातात? केवळ
काळ बदलला म्हणून का त्यांच्यामधील नाती बदलली ? बरेच काही बदल झाले
आहेत. परंतु माणूस तर तोच आहे. ना त्याला आताही मन आहे, भावना आहे. दुःख
झाले तर तो रडतो आणि सुख झाले तर तो आनंदित होतो. काय बदललेले आहे.
काहीच नाही. मग का हा प्रश्न मुलां-मुलीं समोर उभा आहे ? ते का संकोच करतात
मैत्री करायला ? मला वाटतं याचं कारण फक्त मैत्रीकडे पाण्याचा त्यांचा दृष्टिकोण
होय.
शेवटी एवढेच म्हणले की, मैत्रीसारख्या पवित्र नात्याचा कधीही शेवट होऊ
नये. ती जगात कायमच राहिली पाहिजे किंवा मग ती विपरितता येण्याला कारण
फक्त या मैत्रीकडे पाहणारेच आहे. पण मी एक प्रश्न तुमच्याकडेच सोडतो. तो प्रश्न
लेख वाचून झाल्यावर तुम्हीच तुमच्या मनाला विचारा नि ठरवा काय ठरवायचं ते. तो
प्रश्न बघण्याचा? त्यात दोष कुणाचा? मैत्री करणाऱ्यांचा? की त्या मैत्रीकडे
बघणाऱ्यांचा? म्हणूनच मी म्हणतो, मनाचे माहेरघर-मैत्री, मनातील हितगुज
साधण्याच केंद्र-मैत्री,प्रेमाचे प्रतीक-मैत्री , सुख दुखाची सोबत-मैत्री , मायेचा शीतल
स्पर्श – मैत्री ,भावनांची जाणीव-मैत्री , तुझी नी माझी जीवाभावाची मैत्री …!
 नशा म्हणजे जीवनदशा
जगात अनार्थाचे साम्राज्य चालविणारे अंमली पदार्थ कुबेराला भीक मागायला
लावणारे, भीमासारख्या वज्रदेही शरीराला रोगी बनविणारे, सुसंस्कृत मुखात
शिमग्यासारख्या शिव्या आणणारे, पतिव्रतींना पतीच्या हाताने बाजारात बसविणारे,
पित्याचा मुलाकडून व मुलाचा पित्याकडून खून करणारे, हजारोंचा संसार धुळीला
मिळविणारे अंमली पदार्थ यांच्यावर बंदी म्हणजे बंदी ही असलीच पाहिजे.
‘एखादी वाईट गोष्ट नको म्हणताना पुन्हा करणे म्हणजे व्यसन होय’. हे
व्यसन लावणारे अंमली पदार्थ हे साम्राज्याचे शत्रू आहेत. ते जर प्रेमाने
नसतील तर कायद्याने त्यावर बंद असणेच महत्त्वाचे आहे.
अंमली पदार्थ सेवनाची कारणे :
अंमली पदार्थाचे घातक परिणाम ज्ञात असूनही अनेकजण त्याच्या आहारी
गेले आहेत. आजकाल फॅशन नावाखाली कॉलेजच्या युवक युवतींच्या मध्येही अंमली
पदार्थाचे सेवन करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. मित्रांचा दबाव, ताणतणाव, एकटेपणा,
उत्सुकता, दुःख निवारण्यासाठी, आनंद उपभोगण्यासाठी, कौटुंबिक कलह,
शहरीकरण, औदयोगिकीकरण, बेकारी, आर्थिक विवंचना, मौजमजा, छंद, अपेक्षाभंग,
प्रेमभंग, वैफल्य, विरह, शारीरिक व्याधी, दुर्बलता यांमुळे अनेक व्यक्ती अंमली
पदार्थाचे सेवन करतात.
अंमली पदार्थाचे दुष्परिणाम :-
प्रारंभी उत्साहित करणारे, भूक वाढविणारे म्हणून त्याचे आकर्षण वाटते.
परंतु सातत्याने व्यक्ती अशा पदार्थांच्या व्यसनात अधीन होऊन जातो. त्यामुळे
सामाजिक आरोग्य धोक्यात येत असून सामाजिक घडीही बिघडत आहे. आज
बाजारात अंमली पदार्थांची अनेक रुपे पहावयास मिळतात. त्याच्या नियमित सेवनाने
अनेक व्याधी जडतात. लठ्ठपणा (स्थूलता) वाढण्याची शक्यता असते. भूक मंदावते,
शरीरातील पचनक्रियेवर अनिष्ट परिणाम होऊन पोषक द्रव्याच्या अभावामुळे
कुपोषणास व अनेक रोगांस (उदा. रक्तक्षय, पेलॅग्रा, बेरी-बेरी) सामोरे जावे लागते.
अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या व्यक्तींना उच्च रक्तदाब व हृदयविकार संभवतो.
जठराच्या अस्तराचा दाह होऊन ‘जठरदाह’ हा आजार संभवतो. कालांतराने अल्सर
होऊ शकतो. कधी कधी यकृतावर विपरित परिणाम होऊ शकतो. काहींना स्वादूपिंडाचा
दाह होऊ शकतो. कधी कधी यकृतावर विपरित परिणाम होऊन यकृताचा
‘सिरोसिस’ हा आजार होतो. त्यातुनच ‘रक्तक्षय’ तर कधी ‘जलोदर’ होऊ शकतो.
कर्करोग हा पटकन होणारा आजार आहे. तसेच हृदयाच्या पेशी कमजोर होऊन
‘कार्डिओमायोपॅथी’ हा विकार जडून हृदयाची कार्यक्षमता घटते. मधुमेहीसाठी अंमली
पदार्थ घातक ठरतात. तसेच चेतापेशींचा -हास होऊन त्यांचे कार्य बिघडते. त्यातूनच
मानसिक आजार उद्भवतात. रोगप्रतिकारक शक्ती क्षीण होते. जंतू संसर्ग वारंवार
होत राहतो. अंमली पदार्थाचे सेवन करणारे अनेकदा वेश्यागमन करतात. त्यातूनच
एच.आय.व्ही., गुप्तरोगांचा प्रादुर्भाव सुरु होतो.
अंमली पदार्थापासून मुक्ती :-
अंमली पदार्थाच्या सेवनाने अनेक कुटुंबाची वाताहत झालेली आहे. त्यातूनच
कौटुंबिक कलह होऊन खून, मारामाऱ्या, अपघात, चोऱ्या आणि बलात्कार यांसारख्या
घटनाही घडतात. तेव्हा या जीवघेण्या अंमली पदार्थापासून साम-दाम-दंड-भेद
वापरून बंदी असणे गरजेचे आहे.
‘आयुष्याच्या झाडाला
अंमली पदार्थाचे पाणी नको
अमृतभरल्या गळ्यामध्ये
व्यसनाची गाणी नको’
म्हणून अशा पदार्थाबाबत गंभीर विचार व्हायला हावा. किती मोठा हा
विरोधाभास आहे. ‘सुख दुःखाचा व्यसन जणू सांगातीच आहे’. अंमली पदार्थांच्या
सेवनाचे तोटेच इतके अफाट आहेत की वर्णन करणे अवघड आहे. तसेच लागलेले
व्यसन सोडणे अवघड आहे, परंतु प्रबळ इच्छा शक्ती, दुष्परिणामांची तीव्रता विचारात
घेतल्यास त्याचे गांभीर्य जाणवते. त्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्था कार्यरत आहे.
परंतु जनजागृती हे जर साध्य होणार नसेल. तर शासनाने त्यावर कायद्याने बंदी
घालनेच देशाच्या हिताचे ठरणार आहे. अंमली पदार्थाचे सेवन करणारा व विक्री
करणारा दोघांनाही कडक शासन करावे. थोड्याशा आर्थिक फायद्यासाठी शासनाने
तरुणपीढी मृत्यूच्या खाईत लोटू नये. अशा प्रकारचा निर्णय उत्पादक व विक्रेत्यांना
मान्य होणार नसला, तरी तो सार्वजनिक हिताचा आहे ही बाब विचारात घेतली
पाहिजे. आणि अंमली पदार्थावर बंदी ही योग्यच आहे. ती घालणे गरजेचे आहे. हीच
अपेक्षा आज करावी वाटते. नव्हे या मागणीसाठी जन आंदोलन उभे रहावे.
error: Content is protected !!